Weather New Update : राज्यातील हवामानात सध्या सातत्याने बदल होत आहेत. सकाळपासून अंगावर येणारा कडक उन्हाचा चटका आणि दुपारनंतर अचानक बदलून येणारे ढग, वारा आणि पावसाच्या सरी… अशी परिस्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकही गोंधळात पडले असून, बाहेर पडताना छत्री घ्यावी की नाही, असा प्रश्न पडत आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, आज राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या भागांमध्ये वातावरणात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत दुपारनंतर अचानक वाऱ्याचा वेग वाढून मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळू शकतात. याचबरोबर परभणी, लातूर आणि नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि झंझावाती वारे यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दुसरीकडे, विदर्भ आणि कोकणातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट अजूनही कायम आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या किनारपट्टी भागात उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तर अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः कहर केला असून, आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील २४ तासांतील तापमानाचा विचार केला तर विदर्भातील परिस्थिती अधिकच गंभीर दिसून येते. अमरावती येथे तब्बल ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर अकोला आणि वर्धा येथेही तापमान ४४ अंशांच्या घरात पोहोचले. नागपूर, भंडारा, गडचिरोली आणि यवतमाळ येथेही पारा ४३ अंशांच्या पुढे गेला आहे. याउलट महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी तापमान १६ अंशांच्या आसपास नोंदवले गेले, त्यामुळे राज्यात हवामानाचा तफावत स्पष्टपणे जाणवत आहे.
गेल्या काही दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांसह पावसाच्या सरी कोसळल्या. रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये तर काही भागांत गारपीटही झाली, ज्यामुळे उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला. मात्र, या बदलत्या हवामानामुळे शेतीपिकांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकूणच, पुढील काही दिवस राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. कधी प्रखर ऊन तर कधी वादळी पाऊस, या दोन्ही टोकांच्या परिस्थितीत नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. हवामानाचा अंदाज लक्षात ठेवूनच घराबाहेर पडणे, तसेच शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेणे, हेच सध्याच्या परिस्थितीत सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे. Weather New Update
