Pm Kisan News: केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता आता अंतिम टप्प्यात आला असून, राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष या हप्त्याकडे लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता कधी मिळणार, याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र त्याआधीच एक महत्त्वाची बाब समोर आली असून, पीएम किसानच्या २२ व्या हप्त्यासाठी संशयित लाभार्थ्यांची पुन्हा एकदा सखोल तपासणी सुरू करण्यात आली आहे. Pm Kisan News
राज्यात सध्या पीएम किसान योजनेसाठी तब्बल ९१ लाख १६ हजार १६४ शेतकरी पात्र ठरले असून, मागील म्हणजेच २१ व्या हप्त्याच्या तुलनेत यामध्ये सुमारे ७५ हजार शेतकऱ्यांची वाढ झाली आहे. २१ व्या हप्त्यात राज्यातील ९० लाख ४१ हजार २४१ शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. यावेळी मात्र लाभार्थ्यांची संख्या वाढताना दिसत असली, तरी सर्वांनाच हा हप्ता मिळेल का, याबाबत शंका निर्माण झाली आहे.
गेल्या हप्त्यावेळी केंद्र सरकारने सुमारे अडीच लाख संशयित लाभार्थ्यांची यादी तयार केली होती. या लाभार्थ्यांबाबत प्राप्तिकर मर्यादा ओलांडली आहे का, एकाच कुटुंबात पती-पत्नी दोघेही लाभ घेत आहेत का, ई-केवायसी पूर्ण आहे का, जमीन नोंदी बरोबर आहेत का, अशा विविध निकषांवर पडताळणी सुरू आहे. ही यादी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडे पाठवून प्रत्यक्ष तपासणी केली जात असून, पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांचा नव्याने लाभार्थी यादीत समावेश केला जात आहे. त्यामुळे २२ व्या हप्त्याच्या निधी वितरणाच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्र सरकारने पीएम किसानचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर रोजी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. त्यानंतर आता २२ व्या हप्त्यासाठी लाभार्थी निश्चित करण्यात आले असले, तरी हप्ता नेमका कधी जमा होणार, याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. याआधी जानेवारी अखेर हा हप्ता मिळेल, अशी चर्चा होती. मात्र केंद्र सरकारकडून तशी कोणतीही स्पष्ट सूचना अद्याप आलेली नसल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सात फेब्रुवारीपूर्वी हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल, अशी चर्चा गावोगावी सुरू आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, अंतिम तारीख अजून ठरलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपली ई-केवायसी, आधार-बँक लिंकिंग आणि जमिनीच्या नोंदी तपासून ठेवणं गरजेचं ठरणार आहे.
२२ व्या हप्त्यासाठी जिल्हानिहाय लाभार्थ्यांची संख्या पाहिली तर काही जिल्हे आघाडीवर दिसतात. सर्वाधिक लाभार्थी असलेला जिल्हा म्हणजे अहमदनगर, जिथे ५ लाख २५ हजार २७६ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्याखालोखाल सोलापूर जिल्ह्यात ४ लाख ९२ हजार ४४१, कोल्हापूर जिल्ह्यात ४ लाख ६४ हजार ८५०, सातारा जिल्ह्यात ४ लाख ३८ हजार ६५४ आणि पुणे जिल्ह्यात ४ लाख ३३ हजार ७०३ शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत.
एकूणच पीएम किसानच्या २२ व्या हप्त्यापूर्वी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर चाळणी सुरू असून, पात्र शेतकऱ्यांनाच लाभ देण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे पैसे येणारच आहेत, या समजुतीवर न राहता प्रत्येक शेतकऱ्याने आपली कागदपत्रे आणि ई-केवायसी वेळेत पूर्ण आहे की नाही, हे तपासून घेणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

