HSC SSC Result 2026 : राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांसाठी सध्या सर्वात मोठा प्रश्न म्हणजे दहावी आणि बारावीचा निकाल नेमका कधी लागणार? परीक्षा संपून जवळपास महिना उलटला असून प्रत्येकाच्या मनात एकच उत्सुकता आहे. निकाल कधी येणार? आता याबाबत महत्त्वाची माहिती समोर येऊ लागली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) यंदा १० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या. परीक्षेनंतर लगेचच उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम सुरू करण्यात आले होते. सध्या बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी जवळपास पूर्ण झाली असल्याची माहिती मिळत आहे, तर दहावीच्या पेपर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीचा निकाल आधी जाहीर होण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच पुढील १५ ते २० दिवसांत विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे आहेत.
दुसरीकडे, दहावीचा निकाल बारावीच्या निकालानंतर साधारण १० ते १२ दिवसांनी जाहीर होतो. त्यामुळे SSC चा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लागू शकतो, असा अंदाज आहे. मात्र, बोर्डाकडून अजून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, हे लक्षात घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
बारावीच्या परीक्षेला यंदा १४ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाल्यामुळे निकाल प्रक्रिया वेगाने पुढे सरकत आहे. बोर्डाकडून अंतिम पडताळणी आणि तांत्रिक काम पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर केला जाईल.
निकाल कुठे आणि कसा पाहायचा?
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवरून तो पाहता येणार आहे. त्यासाठी खालील वेबसाइट्स महत्त्वाच्या ठरणार आहेत:
- mahresult.nic.in
- hscresult.mkcl.org (बारावी)
- sscresult.mkcl.org (दहावी)
- mahahsscboard.in
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांकडे सीट नंबर आणि आईचे नाव असणे आवश्यक आहे. वेबसाइटवर लॉगिन करून काही सेकंदांत निकाल स्क्रीनवर दिसतो. HSC SSC Result 2026
विद्यार्थ्यांची धडधड वाढली..
निकालाच्या प्रतिक्षेत असलेले विद्यार्थी सध्या मानसिक तणावातून जात आहेत. प्रत्येक दिवस जड जातोय, कारण पुढील शिक्षणाचा मार्ग हा या निकालावरच अवलंबून असतो. पालकही तितक्याच उत्सुकतेने निकालाची वाट पाहत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. निकाल हा आयुष्याचा शेवट नाही, तर पुढील प्रवासाची सुरुवात आहे. गुण कमी-जास्त असले तरी मेहनत आणि चिकाटी असेल तर यशाचा मार्ग नक्की सापडतो.
महत्त्वाची सूचना
सध्या समोर आलेल्या तारखा या संभाव्य आहेत. अधिकृत घोषणा होताच खरी तारीख निश्चित होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ अधिकृत वेबसाइट आणि बोर्डाच्या सूचनांवरच विश्वास ठेवावा.
