Maharashtra Highway News: महाराष्ट्राच्या दळणवळण व्यवस्थेत मोठा बदल घडवणारा नाशिक–अक्कलकोट ग्रीनफिल्ड महामार्ग आता प्रत्यक्षात उतरण्याच्या टप्प्यात आला आहे. 31 डिसेंबर रोजी या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर आता कामाला वेग आला असून, सुमारे 90 टक्के जमिनींच्या अधिसूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. 29 जानेवारी रोजी लोकसभेत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. हा महामार्ग केवळ नाशिक आणि सोलापूरपुरताच मर्यादित न राहता पुढे आंध्र प्रदेशपर्यंत विस्तारला जाणार असून, देशाच्या उत्तर-दक्षिण दळणवळण साखळीतील एक महत्वाचा दुवा ठरणार आहे.
पंतप्रधान गती शक्ती योजनेअंतर्गत मंजूर झालेला प्रकल्प
नाशिक–अक्कलकोट ग्रीनफिल्ड महामार्गाला ‘पंतप्रधान गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन’ अंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी या महामार्गाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. या महामार्गासाठी एकूण 374 किलोमीटर लांबीचा सहा पदरी मार्ग विकसित केला जाणार असून, यासाठी अंदाजे 19,142 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. Maharashtra Highway News
कोणकोणत्या जिल्ह्यांतून जाणार महामार्ग?
हा ग्रीनफिल्ड महामार्ग महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर या पाच प्रमुख जिल्ह्यांतून जाणार आहे. नाशिक ते अक्कलकोट थेट जोडणारा हा मार्ग उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी मोठा दिलासा ठरणार आहे. महामार्ग नाशिकच्या आडगाव परिसरातून सुरू होणार असून, तो पुढे मुंबई–आग्रा महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गाशी जोडण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांतील वाहतूक अधिक जलद होणार आहे.
प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार
हा महामार्ग सुरू झाल्यानंतर नाशिक ते अक्कलकोट प्रवासाचा वेळ सुमारे चार तासांनी कमी होणार आहे. सध्या असलेल्या मार्गांच्या तुलनेत सुमारे 51 किलोमीटर अंतराची बचत होईल. इतकंच नाही तर, हा मार्ग सुरत–चेन्नई महामार्गाचा भाग असल्यामुळे, दीर्घ पल्ल्याच्या मालवाहतुकीत मोठा फरक पडणार आहे. अंदाजानुसार, सुरत ते चेन्नई दरम्यानचा प्रवास सुमारे 14 तासांनी कमी होईल आणि जवळपास 201 किलोमीटर अंतर वाचणार आहे.
रोजगार, उद्योग आणि विकासाला चालना
या महामार्गाच्या उभारणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे. तीन वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. महामार्गामुळे औद्योगिक वाहतूक, कृषी मालाची ने-आण, लॉजिस्टिक्स आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. याचा थेट फायदा महाराष्ट्रासोबतच गुजरात, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांनाही होणार आहे.
महाराष्ट्राच्या विकासातील नवा टप्पा
नाशिक–अक्कलकोट ग्रीनफिल्ड महामार्ग हा केवळ एक रस्ता नसून, तो महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाचा नवा मार्ग ठरणार आहे. प्रवास जलद होणार, खर्च कमी होणार आणि ग्रामीण भाग थेट विकासाच्या मुख्य प्रवाहात येणार आहे. येणाऱ्या काळात हा महामार्ग पूर्ण झाल्यावर महाराष्ट्राच्या नकाशावर दळणवळणाच्या दृष्टीने एक नवा इतिहास लिहिला जाणार, यात शंका नाही.

