Unseasonal Rain in Maharashtra | मार्च महिना म्हटलं की उन्हाचे चटके आठवतात, पण यंदा निसर्गाने वेगळीच खेळी खेळली आहे. १५ मार्चपासून सुरू झालेला अवकाळी पावसाचा धुमाकूळ थांबायचं नाव घेईना. आता तर हवामान तज्ज्ञांनी आणखी एक धोक्याची घंटा वाजवली आहे. स्कायमेटचे तज्ज्ञ महेश पलावत यांच्या मते, येत्या २६ मार्चपासून राज्यात पावसाचा नवा आणि अधिक तीव्र टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. ऐन काढणीच्या हंगामात पावसाचं हे ‘रिटर्न गिफ्ट’ शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

का बदलतंय वारंवार हवामान?
सध्या अरबी समुद्रातून बाष्प ओढलं जात असून भूमध्य समुद्राकडून येणारे ‘वेस्टर्न डिस्टरबन्स’ एकापाठोपाठ एक सक्रिय होत आहेत. २६ मार्चला एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती (Cyclonic Circulation) उत्तर भारतात धडकणार असून त्याचा थेट परिणाम आपल्या महाराष्ट्रावर होणार आहे. यामुळेच दुपारनंतर अचानक ढग दाटून येणे, विजांचा कडकडाट होणे आणि धुळीच्या वादळासह पाऊस पडणे अशा घटना घडत आहेत.
२६ ते ३० मार्च: ‘या’ जिल्ह्यांवर पावसाचं सावट
या नवीन टप्प्यात पावसाचा जोर खालील जिल्ह्यांमध्ये जास्त राहण्याचा अंदाज आहे:
मराठवाडा: नांदेड, धाराशिव, परभणी.
दक्षिण मध्य महाराष्ट्र: सांगली, सातारा, कोल्हापूर.
उत्तर महाराष्ट्र: नाशिक आणि जळगाव पट्ट्यात ढगाळ वातावरण. विशेष म्हणजे, ३० आणि ३१ मार्चच्या सुमारास हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शेतकरी हवालदिल, बागायतदारांना फटका
द्राक्ष बागायतदारांसाठी हा काळ अत्यंत कठीण आहे. द्राक्ष मणी तडकणे आणि कुजणे अशा समस्यांमुळे लाखो रुपयांचं नुकसान होत आहे. केवळ द्राक्षच नाही, तर गहू आणि हरभरा काढणीला आला असतानाच पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे. जरी या पावसामुळे उन्हापासून थोडा दिलासा मिळाला असला, तरी बळीराजासाठी मात्र हे मोठं संकट आहे. ज्या पिकांची कापणी झाली आहे, ते धान्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
