Rain Alert : राज्यातील हवामान पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकले आहे. काही दिवसांपूर्वीच उन्हाच्या कडक झळांनी हैराण झालेल्या नागरिकांना आता अवकाळी पावसाचा तडाखा सहन करावा लागत आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागात अचानक बदललेल्या हवामानामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या २४ तासांत कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची धावपळ उडाली. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग इतका होता की झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याच्या घटनाही समोर आल्या. दरम्यान, आज पूर्व विदर्भातही वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
विशेषतः वर्धा, नागपूर, गोंदिया, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, उर्वरित महाराष्ट्रात वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. काही भागात आभाळ ढगाळ असलं तरी उन्हाचा चटका कायम आहे. उकाडा आणि दमट वातावरणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काल अकोला, अमरावती, वर्धा आणि ब्रह्मपुरी येथे तापमान ४० अंशांच्या पुढे गेले होते. तर नागपूर, परभणी, सोलापूर, चंद्रपूर आणि यवतमाळ येथेही ३९ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदवण्यात आले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ३० आणि ३१ मार्च दरम्यान खानदेश, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. या बदलत्या हवामानामुळे शेतीवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती विशेष चिंतेची आहे. काढणीला आलेली रब्बी पिके या अवकाळी पावसामुळे धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य प्रकारे साठवणूक करावी, तसेच हवामानाच्या अपडेट्सकडे सतत लक्ष ठेवावे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
सध्या एकीकडे कडक उन्हाचा त्रास आणि दुसरीकडे अवकाळी पावसाचा धोका या दुहेरी संकटात सामान्य नागरिक अडकले आहेत. पुढील दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याने प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे. हवामानाचा हा अनिश्चित खेळ कधी थांबणार, हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे. Rain Alert
